‘सततची भीती तुम्हाला सौम्य बनवते. सौम्यपणा हा गुण आहे; पण त्याच्या अतिरेकाने तुम्ही एवढे नेभळट बनाल, की अन्यायाशी लढण्याची उर्मीच तुमच्याजवळ उरत नाही. व्यापक अर्थाने यालाच भित्रेपणा म्हणतात,’ असे सरदार वल्लभभाई पटेल म्हणत.
सरदार पटेल म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील आणि स्वतंत्र भारताच्या उभारणीतील एक कणखर व्यक्तिमत्त्व! देशातील ५६५ संस्थाने विलीन करून घेऊन सामर्थ्यशाली एकसंध भारत उभा करणे हे पटेलांचे महत्त्वाचे योगदान म्हणता येईल. ‘सरदार वल्लभभाई पटेल : भारताचा पोलादी पुरुष’ हे रोहन प्रकाशनाने प्रकाशित केलेले पुस्तक त्यावर प्रकाश टाकते.
सुप्रसिद्ध व ज्येष्ठ पत्रकार बलराज कृष्णा यांनी या पोलादी पुरुषाचा संपूर्ण जीवनपटच अत्यंत ताकदीने या पुस्तकाद्वारे उभा केला आहे. पटेलांचे बालपण, त्यांचा राजकारणातला प्रवेश, गांधीजींबद्दलची त्यांची आस्था, नेहरूंसोबतचे त्यांचे मित्रत्वाचे नाते, तसेच त्यांच्यासोबतचे मतभेद, संस्थानिकांबरोबरच्या वाटाघाटी व संस्थानांचे यशस्वी विलीनीकरण, पटेलांचे राजकीय विचार व त्यांनी वेळोवेळी घेतलेले ठाम व कठोर निर्णय, त्याचप्रमाणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातले विविध पैलू असा या पुस्तकाचा मोठा आवाका आहे.
एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या पटेलांचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व व कार्य-कर्तृत्व उलगडून दाखवणारे हे चरित्र वाचकांना निश्चितच रोमहर्षक व प्रेरणादायी वाटेल. अशा प्रकारचे हे एकमेव चरित्र असल्याचा विश्वास लेखक व प्रकाशकांना वाटतो.
पुस्तक : सरदार वल्लभभाई पटेल : भारताचा पोलादी पुरुष
लेखक : बलराज कृष्णा
प्रकाशन : रोहन प्रकाशन
पृष्ठे : ३४४
मूल्य : ३४० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)